30/09/2025
शारदीय नवरात्रानिमित्त मला भेटलेल्या नवदुर्गांबद्दल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. लिखाण हा माझा प्रांत नाही त्यामुळे हे काम कितपत जमेल याची शंका होती. पण आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे जमून गेले त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. नवदुर्गा मालिकेतील हा शेवटचा लेख आहे.
या लेखमालेची सुरुवात माझ्या जन्मदात्या आईपासून केली होती तर त्याचा शेवट हा कृतप्रज्ञ मातेने करत आहे.
कांचन ताई परुळेकर
कांचन ताईंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. एका राष्ट्रीयकृत बँकेत उच्च पदावर काम करत असताना, 'आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते वेळीच दिले पाहिजे', हा काकाजींचा संस्कार त्यांना अस्वस्थ करत होता. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि महिला सबलीकरणाचे छोटेसे रोपटे लावले व सर्व नीतीमूल्य जपत स्वयंसिद्ध नावाचा वटवृक्ष तयार केला.
ताईंचा स्वभाव हा शिस्तबद्ध होता. त्यांना कामचुकारपणा अजिबात आवडत नसे. एखाद्याची चूक लक्षात येता त्याला तिथेच ती दुरुस्त करावयास लावायच्या, मग ती व्यक्ति कोणीही असो एखादी सामान्य कार्यकर्ती अथवा उच्च पदावरील अधिकारी. सभोवताली होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांची बारीक नजर असायची. एखादा नवीन व्यवसाय किंवा कलाकृती नजरेस पडली तर लगेच त्या व्यक्तीला बोलवून तिला शाबासकी व व्यवसाय विस्तारासाठी मार्गदर्शन करायच्या.
प्रत्येकाच्या जीवनात असे एक वळण येते की तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. माझ्या सुदैवाने त्या वळणावर मला ताई भेटल्या. 'तू करत असलेले काम हे वेगळे आहे आणि याची चांगली प्रगती व विस्तार करणे गरजेचे आहे' हे त्यांनी मला पटवून दिले. सुरुवातीस वेगवेगळ्या प्रदर्शनात मोफत प्रवेश देणे, स्वयंसिद्धा मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना माझ्या कामाविषयी माहिती देणे, संस्थेतील विविध स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून या पर्यावरणपूरक वस्तू भेट देणे तसेच या वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा घेऊन त्यांनी माझ्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. हे सगळं ताई का करतात? यात त्यांचा काय फायदा आहे? असे प्रश्न मला सुरुवातीच्या काळात पडायचे. पण जसजसा ताईंचा सहवास वाढत गेला तसतसे लक्षात आले की ही अतिशय निस्वार्थी भावनेने केलेली समाजसेवा आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारणे म्हणजे एक पर्वणीच. अतिशय मुद्देसूद तसेच समोर आलेल्या प्रश्नाचे तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण उत्तर असायचे. त्या आमच्यासाठी एक ज्ञानकोश होत्या. कांचन ताई म्हटलं की महिला सबलीकरण हे चित्र पटकन सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते पण त्याच्याबरोबर त्यांनी माझ्यासारख्या कितीतरी तरुणांना आर्थिक, वैचारिक व सामाजिक दृष्ट्या समृद्ध केले.
ताईंनी कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा खूप खंबीरपणे लढा दिला. पण म्हणतात ना 'वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही'. ताईंची प्रकृती गंभीर आहे, भेटून जा. असा तारा चा फोन आला आणि लगेचच त्यांना भेटायला गेलो. प्रचंड वेदना होत असताना सुद्धा त्यांनी मला नेहमी प्रमाणे विचारले, चिदंबर नवीन काय केल आहेस? मी त्यावेळी निःशब्द झालो होतो अणि आजही. . .
समाज कल्याणाचे व्रत शेवटपर्यंत उराशी बाळगणाऱ्या या कृतप्रज्ञ मातेला माझे शतशः नमन.
चिदंबर
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर
#नवदुर्गा
Swayamsiddha Kolhapur